मागील वर्षी लॉकडाऊनचा सर्वदूर परिणाम झाला. त्यातून उद्योगही सुटला नव्हता. त्यानंतर उद्योग सुरू होऊन बाजाराला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पहिल्यांदा सव्वा लाख कोटी रुपये इतका जीएसटी जमा झाला. इतकेच नव्हे तर अर्थतज्ज्ञांनी १०% इतका जीडीपी राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
मंगळवारी (ता.१३) माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी घोषित केल्यावर उद्योग, प्रशासन, आणि कामगारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडे, पोलिस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी तसेच संयुक्त संचालक उद्योग दिपक शिवदास* ह्यांच्या उत्कृष्ठ समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. हा समन्वय साधण्यात औरंगाबाद फर्स्ट हा नागरी मंच व सीआयआय, सीएमआयए, मसिआ ह्या औद्योगिक संघटना ह्यांचे मोलाचे योगदान आहे.
हा समन्वय साधल्यामुळे औरंगाबादने एक नवीन आदर्श स्थापन केला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरातील औद्योगिक संघटना औरंगाबादला फोन करून तुम्ही हे कसे साध्य केले याची चौकशी करीत आहेत.
उत्पादन व निर्यातदारावर संचारबंदीचा काहीही परिणाम न होण्याची काळजी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे गोंधळून न जाता उद्योग नियमितपणे सुरू ठेवून कोरोनाशी लढा द्यायचा आहे. या माध्यमातून आपण शासन आणि प्रशासनाला सहकार्य करून कोरोनावर मात करू शकतो.
औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक विकास झपाट्याने होण्यास सुरुवात झाली. याठिकाणी उद्योगासह पायाभूत सुविधा, रोजगार, शैक्षणिक संस्था आणि आरोग्य यंत्रणा उभ्या राहिल्या. विशेष म्हणजे कमलनयन बजाज हॉस्पिटल, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, एमजीएम आणि एमआयटी हॉस्पिटल सारखी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणा ही उद्योगांची देण आहे. आज औरंगाबादचा नावलौकिक आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून जगभरात झाला तो केवळ उद्योगांमुळे. या उद्योगांमुळे रोजगार आणि व्यवसायांची निर्मिती झाली. कोरोना काळात अन्नवाटप, कोरोना चाचण्या, ऑक्सिजन यंत्रे, व्हेंटिलेटर, बेड आणि औषधे उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारत पार पाडली.
आज शहरात जवळपास २ लाख कुटुंबांचा (६ ते ८ लाख व्यक्ती) पोशींदा उद्योग व्यवस्थीत चालणे हे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन समाजातील सर्व घटकांनी ह्याला कोणताही अपप्रचार किंवा राजकारण ह्याला बळी न पडता समर्थन करणे आवश्यक आहे.
आपला विनम्र,
प्रितीश चटर्जी
अध्यक्ष, औरंगाबाद फर्स्ट