शहराच्या विकासावर महापालिका आणि औरंगाबाद फर्स्ट यांच्यात संयुक्त बैठक
औरंगाबाद शहराचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण, वाहतूक नियमन, सार्वजनिक वाहतूक, अतिक्रमण, रस्ते आणि पायाभूत सुविधा या प्रश्नावर महापालिका आणि औरंगाबाद फर्स्ट यांच्यात संयुक्त बैठक ऋषी बागला यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता. २८) सायंकाळी पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, अतिरिक्त प्रशासक अरुण शिंदे, उपप्रशासक औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, सचिव रणजीत कक्कड, कोषाध्यक्ष अनिल माळी, माजी अध्यक्ष मानसिंग पवार, ऋषी बागला, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रेझेंटेशन सादर करतांना औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चटर्जी म्हणाले कि, क्रांती चौक येथील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक सीएमआयए कडून औरंगाबाद फर्स्ट कडे दहा वर्षाकरिता देखरेखीसाठी देण्यात यावे. त्याशिवाय स्मार्ट सिटीच्या अंतर्गत दौलताबाद येथे लाईट आणि साऊंड शो सुरु करावा. त्याशिवाय प्रमुख रस्त्यावरील डावे वळण पूर्णतः खुले करून त्याठिकाणी असलेले अतिक्रमण, अनधिकृत पार्किंग आणि अडथला निर्माण करणारे खांब काढण्यात यावे. औरंगाबाद फर्स्ट तर्फे अमलात येत असलेल्या संत सृष्टी प्रकल्पाकरिता पूल बांधण्याकरिता सहकार्य करावे. इतकेच नव्हे तर औरंगाबाद शहरात महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या खुल्या जागांवर वृक्षरोपण करण्याची परवानगी देण्यात यावी, या मागण्या करण्यात आल्या.
—
रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाची डावी बाजू होणार सुरु
रेल्वे स्टेशन उड्डाण पुलाकडून पैठण कडे जातांना डावी बाजू पूर्णतः बंद आहे. तिथे रस्ता अस्तित्वात नसल्याने उजव्या बाजूने वाहने रॉंग दिशेने येतात. त्यामुळे वाहतूक जाम होवून लहान मोठे अपघात होण्याचा धोका वाढतो. त्यावर पर्याय म्हणजे डाव्या बाजूने रस्ता तयार करून तो लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी श्री. चटर्जी यांनी केली. त्यावर उत्तर देतांना प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी या मागणीला त्वरित सहमती दर्शविली. लवकरात लवकर डाव्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे औरंगाबादकरांना मोठा दिलासा मिळणार आहे
त्याला उत्तर देतांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले कि, औरंगाबाद फर्स्ट ने दिलेले प्रस्ताव, माहिती आणि सूचना या योग्य आहेत. त्यांचा निश्चितच फायदा औरंगाबाद शहराच्या विकासाकरिता होऊ शकतो. सर्व मागण्या आणि प्रस्तावावर योग्य तो विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊ. यातील काही कामे लगेचच सर्वेक्षण करून सुरु करू. काही प्रकल्प महापालिका, स्मार्ट सिटी आणि औरंगाबाद फर्स्ट एकत्र येऊन करता येऊ शकतील. ज्या मागण्या अथवा प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी महापालीकेशिवाय विविध संस्थांचा सहभाग आहे. त्यांच्याशी समन्वय साधून ते पूर्ण होण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन श्री. पांडेय यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत लांडगे यांनी केले. आभार सचिव रणजीत कक्कड यांनी मानले.
यावेळी शहर अभियंता एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, एएस्सीडीसीएल चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम व इतर एएस्सीडीसीएल चे अधिकारी, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतीश चॅटर्जी, सचिव रणजीत कक्कड, कोषाध्यक्ष अनिल माळी, सहसचिव सुयोग्य माछर, रमेश नागपाल, प्रीती शहा, नाना आगलावे, यांची उपस्थिती होती.